मुलांना मोठी स्वप्ने बघू द्या -अभिनव गोयल
लातूर
केवळ प्रशासकीय व पोलीस सेवेतील अधिकारीच देशाची सेवा करीत नाहीत तर इतर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्याची आणि देश सेवा करण्याची संधी मिळते. म्हणून पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने बघू द्यावीत आणि त्यांच्यातील आवड बघून त्यांना आवडीचा क्षेत्रात विकसित होण्याची संधी द्या. कुठल्याही क्षेत्रात करिअर करताना मेहनत व अभ्यास तर करावा लागणार आहे परंतु विद्यार्थ्यांची कार्यक्षमता बघण्याची जिम्मेदारी शिक्षक व पालकांची आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी मंगळवारी दयानंद सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात केले.
श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या वतीने संस्था अंतर्गत सर्व शाळांतील दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व शिष्यवृत्ती वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल व जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, अध्यक्ष शैलेश लाहोटी, सचिव ॲड. आशिष बाजपाई, उपाध्यक्ष राजेंद्र मालपाणी, ईश्वरप्रसाद डागा, राजा नारायणलाल लाहोटी स्कूलचे चेअरमन आनंद लाहोटी, बंकटलाल लाहोटी स्कूलचे चेअरमन डॉ. अनिल राठी, चैतन्य भार्गव, नरेंद्र अग्रवाल व सर्व शाळांचा मुख्याध्यापकांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना अभिनव गोयल म्हणाली की अनेक शाळांमध्ये केवळ शालेय अभ्यासक्रमावर भर दिला जातो परंतु या पलीकडे जाऊन सुसंस्कृत विद्यार्थी घडविण्यासाठी मूल्यशिक्षण गरजेचे आहे आणि त्यांच्यातील प्रश्न विचारण्याची क्षमता विकसित केली पाहिजे. शारीरिक तंदुरुस्तीसाठी क्रीडा क्षेत्रामध्ये किमान कौशल्य निर्माण व्हावे याचबरोबर स्वयं संरक्षण व पर्यावरणामुळे मानवी विकास व जीवनावर अनेक दुर्गामी परिणाम झाले आहेत. म्हणून पर्यावरणाचे ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यात यावे. या गोष्टी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण असून यांचा समावेश अभ्यासक्रमात झाला पाहिजे, अशी अपेक्षा अभिनव गोयल यांनी व्यक्त केली.
एकलव्य होण्याचा प्रयत्न करा- पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे
विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी चा कानमंत्र देऊन जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की तुमचे शिक्षक हे तुमच्यासाठी भगवान श्रीकृष्ण आहेत तुम्ही त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचे पालन करा सहकारी, मित्रमंडळीशी स्पर्धा करा आणि जर स्पर्धा करायला कोणी उरले नसेल तर तुमच्या शिक्षकांचा एकलव्य होण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्याशी स्पर्धा करा. तुम्ही यशस्वी झाल्यावर तुमच्या पाठीवर हात ठेवून ते तुमचे कौतुक करतील. शिक्षकांच्या रूपाने आम्हाला देव मिळाला म्हणूनच आम्ही घडलो असल्याचेही निखिल पिंगळे म्हणाले.
ते म्हणाले की जीवनात जे बनायचे ते बना परंतु त्यातून स्वतःची ओळख निर्माण करा स्वतःला अति शहाणेही समजू नका व कमीही लेखू नका आपण जी स्वप्न पाहतो ती पूर्ण करा. पालकांनी मुलांना जे करायचे ते करू द्यावे. अनेक क्षेत्रात अनेक संधी निर्माण होत आहेत. अभ्यासासोबतच इतरही क्षेत्रात काही चांगली करता येते का याचाही विचार विद्यार्थ्यांनी करावा. डिजिटल क्रांतीमुळे आपल्या संकल्पना, कल्पना कोट्यावधी रुपयांना विकत घेतल्या जाऊ लागल्या आहेत. चांगले जेवण करण्यासाठी चांगल्या हॉटेलात जावे लागते, चांगली पुस्तके शोधण्यासाठी मोठ्या ग्रंथालयात जावे लागते तसेच चांगले शिक्षण घेण्यासाठी चांगल्याच शाळेत जावे लागते. कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण पद्धती विकसित झाली तरी मोबाईल समोर शिकण्यापेक्षा शिक्षकांसमोर शिकणे महत्त्वाचे आहे. पुरणमल लाहोटी यांनी स्वतःच्या कष्टातून इथल्या भागातील लोकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राजस्थान शिक्षण संस्थेच्या माध्यमातून लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाल्याचे पिंगळे म्हणाले.संस्थेचे अध्यक्ष शैलेश लाहोटी आपल्या भाषणात म्हणाले की, कोरोना मध्ये देशामध्ये अनेक बदल झाले. श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेने बदलत्या परिस्थितीचा अभ्यास करून विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकवून ठेवण्यासाठी व विद्यार्थी घडला पाहिजे यासाठी योग्य शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. संस्थेचा वटवृक्ष ८२ वर्षाचा झाला असून विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याचे काम अविरतपणे सुरू आहे. समाजसेवेच्या भावनेतून संस्था कार्यरत असून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे काम आजपर्यंत संस्थेने केले आहे. संस्थेचे सचिव ॲड. आशिष बाजपाई यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कोरोनामध्येही शिक्षण संस्था अंतर्गत सर्व शाळांनी अखंडित शिक्षण देण्यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा प्रचार प्रसार करून शिक्षणात सातत्य ठेवले म्हणूनच चांगले शिक्षण देता आले. गुणवत्ता मिळविण्यासाठी कष्ट, मेहनत किती घ्यायचे असतात ते फक्त गुणवंतांना आणि पालकांना माहिती आहे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये पालकांचाही सिंहाचा वाटा असल्याचे ते म्हणाले.गुणवंतांच्या सत्कार व शिष्यवृत्ती वितरण समारंभात मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेअंतर्गत सर्व शाळांतील दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आनंद कुलकर्णी व योगिता संदिकर यांनी केले तर आभार संस्थेचे सदस्य चैतन्य भार्गव यांनी मानले.
إرسال تعليق