आयोडीन आहे.. सशक्त जीवनाची कुंजी

आयोडीन आहे.. सशक्त जीवनाची कुंजी...
            भारतीय संस्कृतीत अन्न हे पूर्णब्रह्म असे म्हणतात या अन संस्कृतीची दखल जगभरात घेतली जाते. पण आपल्या देशातच ती लोप पावत चालली आहे. प्रत्येक जण धावपळीच्या जीवनात जंक फूड व फास्ट फूडचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. परिणामी त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन त्यांचे शरीर हे आजाराचे माहेर घर बनत चालले आहे. त्यासाठी आयोडीन हे अत्यंत महत्वाचे आहे त्यावर प्रकाश टाकणारा लेख...!!
        आपला आहार हा सकस व समतोल असावा जेणेकरून त्यातून आपल्याला कार्बोदके, प्रथिने, जीवनसत्व, खनिजे हे पोषक घटके मिळतील. आज आपण खनिजा बद्दल बोलायचं झाल तर आपल्या शरीराला  थोड्या प्रमाणात लागणारा व तेवढाच महत्वाचा घटक म्हणजे आयोडीन होय.
          21 ऑक्टोबर हा दिवस भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो यामागचा उद्देश म्हणजे जनतेस दैनंदिन आहारामधील आयोडीनचे महत्व समजावे हा आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपण 21 ऑक्टोबर 2022 रोजी 'जागतिक आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण दिवस" म्हणून साजरा करणार आहोत.
        आयोडीन हे खनिज असून ते प्रामुख्याने सागरी मासे (कोळंबी, केलप, नावच शैवाल), सागरी भाज्या आयोडीनयुक्त मीठ, चीज, कोंबडीच्या अंड्यातील पिवळा पदार्थ, दुध, दही इ. घटकातून मिळते. प्रत्येक व्यक्तीस त्यांच्या वयानुसार आयोडीनची मात्रा आवश्यकता असते ते पुढे उल्लेख केल्या प्रमाणे असून याप्रमाणे प्रत्येकाने दैनंदिन आहारातून आयोडीनची मात्रा घेणे गरजेचे आहे. 
        वय व आवश्यक आयोडीनची मात्रा (मायक्रोग्राम मध्ये) पूढील प्रमाणे आहे. 0 ते 11 महिने 50 मायक्रोग्राम / प्रतिदिन.12 ते 59 महिने- 90 मायक्रोग्राम / प्रतिदिन, 6 ते 12 वर्षे- 120 मायक्रोग्राम / प्रतिदिन, 12 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीस 150 मायक्रोग्राम / प्रतिदिन, गरोदर माता व स्तनदा माता -200 मायक्रोग्राम / प्रतिदिन.
         वरीलप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरास आयोडीनची आव्यशकता असते याप्रमाणापेक्षा कमी प्रमाणात आयोडीन शरीरास न मिळाल्यास विविध वयोगटात सौम्य किंवा अति गंभीर स्वरूपाचे आजार उद्भवतात. यामध्ये प्रामुख्याने गलगंड, तिरळेपणा, हायपोथायरॉडीझम, मेंदूची वाढ खुंटणे, शारीरिक वाढ खुंटणे, मूकबधीरपणा, बुध्यांक कमी होणे तर प्रौढ स्त्रियांमध्ये वारंवार गर्भपात होण्याचे प्रकार उद्भवतात.
          आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणतेही आजार उद्भवू नयेत याकरिता प्रत्येक व्यक्तीने दैनंदिन आहारात आयोडीनयुक्त आहाराचा समावेश करावा जेणेकरून आपले व भावी पिढीचे शारीरिक व मानसिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल.

                                                                   जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, लातूर

Post a Comment

أحدث أقدم