बुद्ध तत्त्वज्ञानात मानवी जीवनाचा विकास ओतप्रोत भरलेला- प्रसिद्ध आंबेडकरवादी वक्त्या सुषमा अंधारे यांचे प्रतिपादन

 बुद्ध तत्त्वज्ञानात मानवी जीवनाचा विकास ओतप्रोत भरलेला- प्रसिद्ध आंबेडकरवादी वक्त्या सुषमा अंधारे यांचे प्रतिपादन


"तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी दिलेला बुद्ध आणि त्याचा धम्म हा मानवाच्या कल्याणाचा विचार मांडणारा आहे. या तत्त्वज्ञानातील प्रज्ञा,शील आणि करूणा ही तत्वे अखिल  प्राणीमात्रांबद्दल माणुसकीची, सहानुभूतीची व प्रेमाची भावना निर्माण करणारी आहेत. तथागताने सांगितलेले पंचशील तत्व आणि अष्टांग मार्ग हे जगातल्या कोणत्याही माणसाला सदाचार सद्गुणआणि मानवी संस्कृतीच्या वृद्धीकडे घेऊन जाणारे आहेत .बुद्ध हे मार्ग दाता होते. ते मोक्षदाता नव्हते.त्यांचा अष्टांग मार्ग हा मानवाच्या कल्याणाचा मूलभूत पाया असून त्यातील एका मार्गावर दुसरा अवलंबून आहे. म्हणून कोणत्याही माणसाला आनंदी जीवन जगायचे असेल तर या अआष्टांग मार्गांचा अभ्यास करून तो आत्मसात करावा. ज्यांनी ज्यांनी तो आत्मसात केला.ते ते विकास पावले. आनंदी झाले. कोणत्याही व्यक्तीने आपल्या सुखासाठी व आनंदासाठी बाहेर भटकंती करण्याची गरज नाही. तर हे सुख व आनंद आपल्या स्वतःच्या वर्तनातूनच निर्माण होते आणि हे वर्तन जर बुद्ध तत्त्वज्ञानास अनुसरून असेल तर  ती व्यक्ती समृद्धतेच्या मार्गावर आरुढ होते. सम्यक संबुध्द होते,प्रबुद्ध होते आणि हाच  मानवाच्या जीवनातील सर्वात मोठा उत्कर्षबिंदू आहे. कोणत्याही व्यक्तीने आपल्या सुखाचा शोध  बाहेरच्या जगात घेण्याची आवश्यकता नाही. ते सुख आपल्या वर्तनातच असते. आपल्या मूल्यात्मक जगण्यात असते.  ही मूल्ये म्हणजेच तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाचे समग्र तत्त्वज्ञान होय. जगात आज बुद्धाचा धम्म चोहीकडे पसरलेला आहे. तो या आदर्शवादी व मानवतावादी मूल्यांमुळेच अनेक देशांनी या तत्त्वज्ञानावर आधारित आपली प्रगती साधलेली आहे. या तत्त्वांचे अनुपालन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची वैयक्तिक प्रगती तर होते. त्याचबरोबर त्याच्या हातून समाजाच्या व देशाच्या प्रगतीचेही कार्य घडते.म्हणून आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीने बुद्धाचे हे त्रिशरण पंचशील,अष्टांग मार्ग आणि दस पारमिता यांस अनुसरून आपले वर्तन करावे व आपला आणि आपल्या देशाचा उत्कर्ष करावा." असे मत लातूर येथे दि.२५ आणि २६ मार्च २०२३ या कालावधीत संपन्न झालेल्या ३-याअखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या दि.२६ मार्च २०२३ रोजी संपन्न झालेल्या समारोप समारंभा प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रसिद्ध आंबेडकरवादी विचारवंत सुषमा अंधारे  यांनी व्यक्त केले. याप्रसंगी मंचावर अध्यक्ष म्हणून बी.एस.एन.एल.चे जिल्हा प्रबंधक मा अनिल बनसोडे यांची उपस्थिती होती. तसेच प्रसिद्ध विचारवंत मा.श्रीमंत कोकाटे यांचीही यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती होती. या सत्राचे प्रास्ताविक मा.मोहन माने यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.लहू वाघमारे आणि रंजना गायकवाड यांनी केले.तर आभार मा.बालाजी कांबळे यांनी मानले. या परिसंवादाच्या सत्रासाठी महाराष्ट्रातील विविध भागातून अनेक उपासक, उपासिका  उपस्थित होत्या याप्रसंगी मंचावर अध्यक्षीय मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी यांचीही उपस्थिती होती.

Post a Comment

أحدث أقدم