सरस्वती विद्यालयाची वेगळी ओळख निर्माण करणारे मुख्याध्यापक शेळके

सरस्वती विद्यालयाची वेगळी ओळख निर्माण करणारे मुख्याध्यापक शेळके
खाडगाव रोड, प्रकाशनगर येथील सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कालिदास हरिदास शे- ळके सर ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर गुरुवार, दि. ३१ ऑगस्ट २०२३ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या या सेवापूर्तीनिमित्त त्यांच्या आयुष्याच्या वाटचालीबद्दलचा हा लेख

श्री कालिदास हरिदास शेळके बोर्डा (ता. कळंब जि. धाराशिव) येथील मूळ रहिवासी असून त्यांचे शिक्षण बीएससी, बी. पीएड झाले. त्यांचे वडीलही शिक्षक असल्याने त्यांनी शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याचे ठरविले. सरांचे वडील व श्री रामकिशनजी राठी हे एकाच शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. तेव्हा सरस्वती विद्यालयात विज्ञान विषयाची जागा रिक्त असल्याने राठीसरांनी शेळकेसरांना आपल्या बालविकास शिक्षण प्रसारक मंडळ लातूर द्वारा संचलित सरस्वती विद्यालय खाडगाव प्रकाशनगर लातूर या शाळेत दि. १२/०६/१९८९ रोजी प्रथम नियुक्ती दिली. आता ते गुरुवार, दि. ३१/०८/२०२३ रोजी ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत.

एक उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून इतर शाळा त्यांच्याकडे पाहतात. अनेक नव्या संकल्पना राबवून त्यांनी शाळा सदैव चर्चेत ठेवली. दहावीच्या मुलांची तयारी करून घेण्यासाठी त्यांनी ज्यादा तासिका सुरू केल्या. १९९५ मध्ये सरस्वती विद्यालयाचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आणि त्यानंतर सातत्याने गुणवत्ता टिकून ठेवण्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यालयाने केले. दहावीच्या वार्षिक परीक्षेचा विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला पाहिजे. यासाठी त्यांनी ज्यादा तासाचे नियोजन केले. त्यामुळे विद्यालयाचा निकाल ९९ टक्के लागला. आजपर्यंत गुणवत्ता टिकवून ठेवण्याचे काम लातूर जिल्ह्यात सरस्वती विद्यालयाने केले आहे. याचे श्रेय शेळके सरांना जाते.

इ. स. १९९७ मध्ये लातूर जिल्ह्यात पहिली कॉम्प्युटर लॅब सरांनी सरस्वती विद्यालयात सुरू केली. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने विद्यालयात स्पर्धा पर- क्षा विभाग सुरू केला. याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला. क्रीडा स्पर्धांमध्ये संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे १९९७ साली खो- खो स्पर्धेसाठी राष्ट्रीय पातळीवर झेप घेऊन सुवर्णपदक पटकावले. तसेच जिल्ह्यात पहिली आयसीटी लॅब सरस्वती विद्यालयातच सुरू केली. तसेच २००९ मध्ये डिजिटल क्लासरूम तयार करून त्याचा शिक्षकांच्या अध्यापनासाठी वापर केला.

नवनवीन गोष्टी शिकण्याची जिद्द, अभ्यासपूर्ण वाणी, सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे कसब, प्रत्येक वेळी निर्माण होणाऱ्या अडचणीतून कौशल्याने मार्ग काढण्याची शैली, सर्वसामान्यांत मिसळण्याचा मनाचा मोकळेपणा, प्रत्येकाच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे कौशल्य, माणसं जोडण्याची कला, अधिकारी, सहकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे धाडस आणि महत्त्वाचे म्हणजे सामान्य माणसांसोबत जुळलेली नाळ कायम टिकून आहे. या गुणांमुळे शेळके सर शिक्षण क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व ठरले आहेत.

शेळके सरांचा प्रवास एक शिक्षक ते 'मुख्याध्यापक असा झाला. गोरगरीब, दीनदलित, सर्व जाती-धर्मातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. आज ते मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना पुढील आयुष्य आरोग्यमय जावे व त्यांना दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
- शामराव भानुदास लवांडे (सांस्कृतिक विभाग प्रमुख ) सरस्वती विद्यालय, खाडगाव, प्रकाशनगर, लातूर

Post a Comment

أحدث أقدم