विद्यार्थ्यांनी मोबाईल हे नवसंवादाचे तंत्रज्ञान माहिती आणि ज्ञान संपादनासाठी वापरावे-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

विद्यार्थ्यांनी मोबाईल हे नवसंवादाचे तंत्रज्ञान माहिती आणि ज्ञान संपादनासाठी वापरावे-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

लातूर: संवादाच्या नवतंत्रज्ञानाचा वापर माहिती आणि ज्ञानासाठी होणे गरजेचे आहे. तुम्ही फक्त व्हाट्सअप आणि फेसबुकसाठी त्याचा वापर करत असाल तर त्याचा अर्थ नव्या तंत्रज्ञानाचा वापर दुर्दैवाने तुमच्या भल्यासाठी करत नाही असा होतो. नवसंवादमाध्यम तुम्हाला अधिक फोकस होण्यासाठी मदत करणारे आहेत, त्यामुळे त्यांचा वापर तुमच्या विकासासाठी करा, असा मोलाचा सल्ला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिला.

  लातूर तहसील कार्यालयामार्फत महसूल सप्ताह निमित्त ‘युवा – संवाद’ कार्यक्रमाचे दयानंद कला महाविद्यालयात आयोजन केले होते. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी बोलत होत्या. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी डॉ. सुचिता शिंदे, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे -विरोळे, प्राचार्य डॉ. शिवाजीराव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना शासनाचे कागदपत्रे खूप महत्वाची ठरतात. ते सर्व कागदपत्रे तुम्हाला तुमच्या हातात मिळावेत आणि तुमच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात म्हणून ‘युवा संवाद’ हा कार्यक्रम ठेवला आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि त्यांची टीम इथे आहे. त्यामुळे याचा अधिकाधिक लाभ घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांनी विद्यार्थ्यांना केले.

चाकोरीबद्ध विचार न करता चाकोरीच्या बाहेरचा विचार करा. खूप वाचन करा, त्यातून नवी दृष्टी मिळते. करियर करताना दोन पर्याय ठेवा. त्यातला पहिला पर्याय तुम्हाला मनातून वाटतं त्या क्षेत्रासाठी प्रयत्न करा. त्यात यश नाहीच आलं तर दुसरा जो हमखास पर्याय असेल तो हातात ठेवा, असा मोलाचा सल्ला जिल्हाधिकारी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नालाही जिल्हाधिकारी यांनी मोकळेपणाने उत्तर देत हा संवाद अधिक आनंददायी केला.     
 
आज जो युवा-संवाद कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यात विद्यार्थ्यांना कोणत्या कागदपत्राची गरज आहे. याची नोंदणी करून सात दिवसात त्यांना आवश्यक असलेली कागदपत्रे दिली जातील, अशी माहिती लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे -विरोळे यांनी प्रास्ताविकात दिली. यावेळी काही विद्यार्थी, विद्यार्थ्यांनीना प्रतिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार डॉ. दिलीप नागरगोजे यांनी मानले.
*****

Post a Comment

أحدث أقدم