लातूर- राज्य शासनातर्फे 1 सप्टेंबर हा दिवस रेशीम दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त लातूर जिल्हा रेशीम कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपणाने कार्यशाळेला प्रारंभ झाला. रेशीम कोष उत्पादनातून चालू वर्षी एका पिकातून एक लाख रुपयेपेक्षा जास्त उत्पन्न घेणारे हरंगुळ बु. येथील लाभार्थी जिंदासाब याकुबसाब शेख यांचा मुलगा शौकत शेख व चिकुर्डा येथील शेतकरी सोमनाथ धोंडीराम हुडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
साखरा येथील नवीन शेतकरी श्री. बनसोडे व श्री. मोटे यांचाही सत्कार करण्यात आला. सद्य परिस्थितीत पावसाच्या अभावी इतर पिके येतील की नाही, या चिंतेत इतर शेतकरी असताना तुती लागवड असणाऱ्या शेतकऱ्यांनी सरासरी 50 ते 60 हजार रुपयाचे उप्तन्न काढले आहे.
कार्यशाळेत रेशीम कार्यालयाचे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी श्री. पेठकर यांनी रेशीम शेतीचे महत्व विशद करुन प्रत्येक शेतकऱ्याने किमान एक एकर तुती लागवड करण्याचे आवाहन केले. तसेच किटक संगोपनाविषयी तांत्रिक माहिती दिली. श्री. सुरनर यांनी जैविक खताचा वापर करुन दर्जेदार पाला उत्पादन आणि कोष उत्पादनाविषयी मार्गदर्शन केले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या लाभाबाबत प्रकल्प तांत्रिक अधिकारी पवार व कदम यांनी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
إرسال تعليق