एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

 

      उस्मानाबाद- अवकाळी पाऊस, गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार असून त्याबाबतचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या संकटकाळात राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.

      उस्मानाबाद जिल्ह्यात 8 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वाडी बामणी (ता. उस्मानाबाद) येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, आमदार राणा जगजीतसिंह पाटील, माजी खासदार रवी गायकवाड, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. एम. प्रसन्ना, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

       अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी कुटुंबातील असल्याने आपल्याला शेतकऱ्यांवर कोसळलेल्या संकटाची जाणीव आहे. त्यामुळे या नुकसानीची माहिती घेण्यासाठी आपण शेतात आलो असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

         राज्य शासन सदैव शेतकऱ्यांसोबत असून शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची अधिक भरपाई शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी एनडीआरएफच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसेच सततच्या पावसाचा समावेश नैसर्गिक आपत्तीमध्ये करण्याचा निर्णयही राज्य शासनाने घेतला आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे असून अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना दिली जाईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले. अन्नदाता बळीराजावर आलेले अरिष्ट दूर होवून त्यांना दिलासा मिळावा, यासाठी अयोध्येत श्रीराम चरणी प्रार्थना केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

            उस्मानाबाद जिल्ह्यात 8 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपिटीने शेतपिके, फळबागांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात 2 हजार 500 हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. तसेच 20 मोठी जनावरे दगावल्या असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना दिली.

           मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत, आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी तुळजापूर येथे तुळजाभवानीचे दर्शन घेतले.

 

मोर्डा, वाडी बामणी येथे शेतकऱ्यांशी संवाद

 

      मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुळजापूर तालुक्यातील मोर्डा येथील श्रीमती सीताबाई उत्तम सुरवसे आणि उत्तम सुरवसे या शेतकरी दाम्पत्याच्या द्राक्ष बागेची पाहणी केली. दोन एकर क्षेत्रावरील द्राक्ष बाग वादळी पावसाने भुईसपाट झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरवसे दांपत्याची आपुलकीने विचारपूस केली. त्यांना धीर दिला. राज्य शासन आपल्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही दिली. तसेच मुख्यमंत्र्यांनी यावेळी सुरवसे दाम्पत्याला कोणकोणत्या बँकांची किती कर्जे आहेत, याची विचारणा केली. सुरवसे यांच्या भुईसपाट झालेल्या द्राक्ष बागेत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आतमध्ये जावून नुकसानीची पाहणी केली.

         उस्मानाबाद तालुक्यातील वाडी बामणी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. येथील बाबासाहेब उंबरदंड आणि श्रीमती साधना उंबरदंड या शेतकरी दाम्पत्याच्या कलिंगड आणि ड्रॅगन फ्रुट बागेच्या नुकसानीची पाहणी केली.

Post a Comment

أحدث أقدم