खत विक्रेत्यांनी लिकिंग केल्यास कारवाई

खत विक्रेत्यांनी लिकिंग केल्यास कारवाई!
जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचा इशारा : संतोषभाऊ सोमवंशी यांंच्या तक्रारीची घेतली दखल
लातूर : आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना लिकिंग विरहित रासायनिक खतांचा सुरळीत पुरवठा करावा, असा आदेश देत शेतकऱ्यांची मागणी नसतानाही इतर रासायनिक खते शेतकऱ्यांना जबरदस्तीने देऊ नये, तशा तक्रारी आल्यास संबंधित खत विक्रेत्यावर कारवाई केली जाईल, असा आदेश जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांनी बजावला आहे. लिंकिंग विरहित रासायनिक खतांचा पुरवठा करा, तसेच मिश्र खते विक्री बंद करण्यात यावी, अन्यथा  आक्रमक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेनाद्वारे दिला होता. त्याची दखल घेत कृषी अधिकाऱ्यांनी याबाबत आदेश काढला आहे.
लातूर जिल्ह्यात खरीप व रबीच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांची मागणी असते. या वर्षाच्या खरीप हंगामात रासायनिक खतांचा सुरळीत पुरवठा होण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या आहेत. शेतकऱ्यांकडून मागणी असलेल्या डीएपी, 10:26:26 ,12:32:16, एमओपी या मुख्य खतांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्याचाच गैरफायदा घेत रासायनिक खत कंपन्या व घाऊक विक्रेते व किरकोळ विक्रेते यांच्या संगनमताने मागणी असलेल्या मुख्य रासायनिक खतासोबत शेतकऱ्यांकडून मागणी नसलेल्या नॅनो युरिया, कंपोस्ट, मायक्रोन्यूट्रियंट, वाटर सोलूबल खते, गंधक तसेच दुसऱ्या रासायनिक खतांचे मुख्य खतासोबत लिंकिंग करण्यात येत आहे, अशी तक्रार सोमवंशी यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे केली होती. मागणी नसलेला माल शेतकऱ्यांच्या माथी मारला जात आहे. अगोदरच रासायनिक खतांच्या किमतीत प्रचंड मोठ्या प्रमाणात दरवाढ झालेली आहे. त्यातच लिंकिंगच्या मालाचा आर्थिक बोजा सामान्य शेतकऱ्यांना पेलवणारा नाही, हे या तक्रारीतून निदर्शनास आणून दिले होते. या तक्रारीची दखल घेत कृषी अधिकाऱ्यांनी हा आदेश काढला आहे. जर शेतकऱ्यांकडून अशा तक्रारी आल्या तर खत नियंत्रण आदेश 1985 नुसार कारवाई केली जाईल, असा इशाराही या आदेशात दिला आहे.

Post a Comment

أحدث أقدم