ग्रामीण भागातून ऊस वाहतूक करणारी बैलगाडी नामशेष

ग्रामीण भागातून ऊस वाहतूक करणारी बैलगाडी नामशेष 
 मुरुम ( प्रा. डॉ. महेश मोटे, प्रतिनिधी) : तंत्रज्ञानाच्या युगात पारंपारिक बैलगाडी दिवसेंदिवस नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे. सध्याचे युग गतिमान असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी कमी वेळेत जास्त काम कसे करता येईल. यावर जास्त भर दिला जात आहे. अशातच वेळेची बचत करण्यासाठी चालु स्थितीतील साखर कारखान्यांनी वेळेची बचत व ऊस वाहतूक लवकरात लवकर कशी होईल. बैलगाडी वाहणाऱ्या बैलांवर ओझे किती लादायचे याचा विचार सध्या शेतकरी करताना दिसत आहे. अधिक बैलगाडीतून उसाची वाहतूक केल्यास कदाचित बैल जोडीस त्रास होण्याची शक्यता असते. यातून एखादा बैल दगावण्याची शक्यता असते. यामुळे मुक्या बैलांना त्रास होऊ नये याची काळजी घेतली जाते. साधारणपणे एका बैलगाडीमधून दोन टनापर्यंत वाहतूक होऊ शकते. कोणत्याही शेतकऱ्याचा ऊस शेतात जास्त दिवस उभा राहू नये. यासाठी ट्रक, टँक्टर आदी वाहनांच्या सहाय्याने ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जात आहे. पुर्वी ऊस वाहतूक करण्यासाठी बैलगाडीचा सर्रासपणे उपयोग केला जात असे. तेव्हा परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर होते. बैलगाडी ऊस वाहतूक साधारणपणे दहा किलोमीटरच्या आत राहायची. त्यासाठी बैलगाडी ऊस ट्रेंडर काढुन ते ऊस वाहतुकीला दिले जात होते. परंतु आता बाहेरील ऊस पुरवठा क्षेत्र वाढल्याने जास्त किलोमीटर वरुन बैलगाडी वाहतूक करू शकत नाही. म्हणून लांब पल्ल्याची ऊस वाहतूक शेवटी साखर कारखान्यांना आधुनिकरणाकडे वळून यांत्रिकी साधनांचा उपयोग करावा लागत आहे. त्यामुळे बैलगाडी वाहतूकीचे प्रमाण कमी झाले आहे. आता बाजारपेठेत बैल जोडी खरेदी करण्यासाठी मोठे भांडवल लागते. त्यासाठी कर्ज घ्यावे लागते. सध्या काही कारखाने बंद असल्याने पुर्वीचे काही बिले बंद पडलेल्या साखर कारखान्याकडे अडकले असल्याने काही अंशी आता उसतोड कामगार या कामांकडे कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे पुर्वी ज्या साखर कारखान्याकडे ४५० च्या आसपास बैलगाडी ऊसवाहतुकीसाठी असायच्या त्या कारखान्याकडे आता ऊस वाहतुकीसाठी फक्त २५० बैलगाडी उपलब्ध आहेत. त्यामुळे आता ट्रक, ट्रॅक्टर, यांत्रिकी ऊस तोड मशीन यामुळे वेळेची बचत व ऊस लवकर तोडला जातो. त्यामुळे कमी वेळेत कारखाना स्थळांवर ऊस लवकर जातो. यामुळे सध्या बैलगाडीवरील ऊसवाहतुक नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे. पुर्वी ग्रामीण भागातून ऊसांची भरलेली बैलगाडी रस्त्याने चालली तर लहान मुले ऊस ओढण्यासाठी एकच गर्दी करायचे व बैलगाडीतून ऊस ओढायचे परंतु आता हे चित्र दिसत नाही. खडतर परिश्रम, रस्त्याची खराबी, बैलगाडी खरेदीसाठी भांडवलाचा तुटवडा यामुळे या व्यवसायाला काहींनी थेट राम-राम ठोकला असल्याचे ग्रामीण भागातून दिसून येत आहे.

Post a Comment

أحدث أقدم