खरीप हंगामासाठी बियाणे, खाते खरेदी करताना शेतकऱ्यांनी दक्षता घेण्याचे आवाहन
लातूर : आगामी खरीप हंगामासाठी बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी करतांना शेतकऱ्यांनी दक्षता घेण्याचे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. तसेच गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदीस प्राधान्य दयावे, असे कृषि विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
बनावट भेसळयुक्त बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडूनच पावतीसह खरेदी करावी. खरेदी केलेल्या बियाणाचे वेस्टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडेसे बियाणे पिकांची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाण्याची पाकिटे सीलबंद अथवा मोहरबंद असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरील वापराची अंतिम मुदत तपासून घ्यावी. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री होत असल्यास अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.
कीटकनाशके अंतिम मुदतीच्या आतील असल्याची खात्री करावी. आपल्या तक्रारीविषयी माहिती प्रत्यक्ष, दूरध्वनी, ई-मेल, एसएमएसद्वारे देवून शासनाच्या गतिमान गुण नियंत्रण अभियानात सहभागी व्हावे. कृषि निविष्ठा विषयी असलेल्या अडचणी, तक्रारी सोडविण्यासाठी किंवा मार्गदर्शनासाठी कृषि विभागाच्या 18002334000 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक श्री. दिवेगावकर यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा