लातूरच्या श्री.सिद्धेश्वर मंदिरात 31 जोडपे झाले विवाहबद्ध

 लातूरच्या श्री.सिद्धेश्वर मंदिरात 31 जोडपे झाले विवाहबद्ध

 
लातूर : येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय व सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि.07 मे 2023 रोजी लातूरचे सुप्रसिद्ध ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिराच्या पावन भूमीत 31 जोडप्यांचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा थाटामाटात संपन्न झाला.या सर्वधर्मीय विवाह सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा.दिलीपराव देशमुख उपस्थित होते.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मूळ संकल्पना मांडणारे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार डिगे व वर्तमान संकल्पना मांडणारे महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त मा.महेंद्र महाजन उपस्थित होते.
                                                      
  ‌   हा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा वधु वरांच्या रुढी,परंपरेनुसार संपन्न झाला.या 31 नववधू-वरांची भव्यदिव्य अशी वरात उक्का मैदान,गांधी चौकपासून गोलाई,सुभाष चौक, हत्तेचौक मार्गे सिद्धेश्वर मंदिरापर्यंत सनई चौघड्याच्या सुरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत काढण्यात आली.या वरातीत लातूर शहरातील विविध दिग्गज मान्यवर सहभागी झाले होते.यानंतर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रात्री ठिक 07:00 वाजता विवाह सोहळा संपन्न झाला.याप्रसंगी सर्व समाजाचे धर्मगुरू उपस्थित होते, त्यांनी वधुवरांना शुभाशीर्वाद दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.दिलीपराव देशमुख यांनी सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे भरभरून कौतुक केले.न्यायमूर्ती शिवकुमार डिगे धर्मादाय आयुक्त असताना सर्वधर्मीय सामूहिक विवाहाची संकल्पना मांडली व त्यांनी प्रत्यक्षात आणली,त्याबद्दल त्यांचे आभार मानले.न्याय,दया,क्षमा,
कर्तव्यदक्षता,मानवता या भूमिकेतून त्यांनी काम केले म्हणून मी जज म्हणण्यापेक्षा मला न्यायाधीश ,न्यायमूर्ती हा शब्दच त्यांच्यासाठी योग्य वाटतो. तो जेज या शब्दात दिसून येत नाही.या विवाह सोहळ्यात जवळपास 13 हजार वऱ्हाडी लोकांची भोजनव्यवस्था मांजरा परिवाराने केली व यापुढेही दरवर्षी भोजनव्यवस्था करण्याचे आश्वासन मा.दिलीपराव देशमुख यांनी दिले.
 
         याप्रसंगी न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांनी लातूर आज सर्वच क्षेत्रात नावलौकिक  मिळवत आहे.विवाह करण्यासाठी वडिलांकडे पैसे नाहीत म्हणून एका मुलीने आत्महत्या केली.त्यातून मला ही संकल्पना सुचली.दुसरीकडे संस्था,ट्रस्ट,मंदिरे यांच्याकडे कोट्यवधी पैसा पडून आहे,अशा संस्थांनी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यासाठी सामाजिक भान ठेवून पुढे आले पाहिजे.अशा संस्थांनी समाजातील दुःख कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे मत मांडले, तर महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त यांनी धर्मादाय संस्था फक्त शिक्षण संस्था देण्यापुरतीच मर्यादित नाही.ज्या ज्या ठिकाणी धर्म आहे, मानवतेचे कार्य आहे त्या त्या ठिकाणी धर्मादाय कार्य करते.आज महाराष्ट्रात विविध संस्थांच्या माध्यमातून सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा पार पडत आहेत.यात न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांचा मोलाचा वाटा आहे.तसेच दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांनी सर्वधर्मीय वधुवरांना शुभाशीर्वाद देऊन दयानंद शिक्षण संस्था नेहमीच अशा सामाजिक उपक्रमास नेहमीच सहकार्य करेल असे सांगितले.
     
   याप्रसंगी धर्मादाय सहआयुक्त बी.डी.कुलकर्णी,धर्मादाय उपआयुक्त श्रीमती हि.का.शेळके,सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्रीमती पी.आर.निकम,माजी आमदार त्र्यंबक भिसे,धर्मा सोनकवडे ,आबासाहेब पाटील, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी,दयानंद शिक्षण संस्थेतील विविध महाविद्यालयाच प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड,प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड,प्राचार्य डॉ.राजाराम पवार,प्राचार्य डॉ.वाजीद चाऊस यांची प्रमुख उपस्थिती होती.या विवाह सोहळ्याचे प्रास्ताविक जगन्नाथ पाटील यांनी केले तर सर्वधर्मीय विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष रमेश बियाणी यांनी या सर्वधर्मीय विवाह सोहळ्याची भूमिका मांडली.या समितीने अहोरात्र प्रयत्न करून भव्यदिव्य असा विवाह सोहळा घडवून आणला.यासाठी समितीचे अध्यक्ष रमेश बियाणी,जगन्नाथ पाटील,अशोक गोविंदपुरकर,सौ.सुभदा रेड्डी, ॲड.संगमेश्वर पाटील,देविदास काळे,अशोक भोसले,बाबासाहेब कोरे,प्रा.गोविंद घार,रमेश राठी, रमेश भुतडा,बसवंत भरडे, ॲड.  विठ्ठल देशपांडे, ॲड शिवाजीराव नागरगोजे, ॲड. प्रसाद कदम यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.या विवाह सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा.संदीप जगदाळे,प्रा.बळवंत सूर्यवंशी, बालाजी सूळ यांनी केले तर आभार अशोक भोसले यांनी मानले.रात्री नववधूवरांना संसार उपयोगी भांडे,रॅक,गॅस आणि प्रत्येकी 11हजाराचा चेक देऊन त्यांचा यथोचित सन्मान करून त्यांना पाठवण्यात आले.याप्रसंगी वधू-वराकडील वऱ्हाडी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यांच्यासाठी दयानंद फार्मसी महाविद्यालयांतर्फे वऱ्हाडासाठी प्रथमोपचार केंद्रही उभारण्यात आले होते.यावेळी मैफिल सुरांची या कार्यक्रमाने विवाह सोहळ्याची शोभा वाढविली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने