टंचाई परिस्थितीचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

 टंचाई परिस्थितीचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा
लातूर - चाकूर तालुक्यातील सरासरी पाऊस 872.9 मिमी पडतो तो या वर्षी 529.5 मिमी एवढा पडला आहे. 1 जानेवारी ते 31 मार्च पर्यंत 22 गावात संभाव्य पाणी टंचाई गृहीत धरून तालुका प्रशासनाने नियोजन केले आहे. पुढील दिड महिने चारा पुरेल पण पुढचे नियोजन करावे असा आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी दिला.
  चाकूर पंचायत समिती सभागृहात सभागृहात आयोजित टंचाई संदर्भातील आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होत्या. यावेळी विभागीय उपाधिकारी प्रवीण फुलारी, जिल्हा नगरपालिका प्रशासनाचे सह आयुक्त रामदास कोकरे, चाकूरचे तहसीलदार रेणुकादासजी देवणीकर, गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे, यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
  चाकूर तालुक्यात पुढचे दिड महिने पुरेल एवढा चारा शिल्लक आहे. पण पुढचे नियोजन करतांना ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे, त्यांचा चारा बियाणे देऊन त्यांना चारा घेण्यास सांगावे असे आदेश तालुका कृषी विभागाला जिल्हाधिकारी यांनी दिले. संभाव्य पाणी टंचाई चा आराखडा तयार करतांना 1 जानेवारी ते 31 मार्च पर्यंतचा 22 गावांचा केला आहे. त्या पुढचाही आराखडा तयार केला आहे, हे करतांना अधिग्रहण, फिडींग पॉईंट बद्दल काटेकोर नियोजन करा अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी यावेळी दिल्या.
वन्य प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे तयार करा
  या भागात हरीण आणि इतर वन्य प्राणी आहेत. उन्हाची तीव्रता जशी वाढेल तसे नैसर्गिक पाणवठे सुकतील. त्यावेळी या वन्यप्राण्यांना पाणवठे तयार करा. जिथे पाणवठे शक्य नसतील तिथे अखर्चीक असे बाद झालेल्या गाड्यांच्या टायरचेही चांगले पाणवठे तयार करता येतील. ते वेळच्या वेळी भरून ठेवण्याची व्यवस्था मात्र करा अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.
जिथे पाणी शिल्लक आहे. तिथून पाणी उपसा होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने