भाजपाच्या दुचाकी रॅलीने लातूर तिरंगामय

                                     भाजपाच्या दुचाकी रॅलीने लातूर तिरंगामय

                    माजी मंत्री आ. निलंगेकरांसह, खा. श्रृंगारेंचाही सहभाग


लातूर/प्रतिनिधी - भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्स वर्षानिमित्त हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी आणि सदर अभियानाच्या जनजागृतीसाठी भाजपाच्या वतीने गेल्या कांही दिवसांपासून विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते. या उपक्रमांचा एक भाग म्हणून लातूर शहर जिल्हा भाजपाच्या वतीने आज लातूर शहरातून भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत  तिरंगा ध्वजासह हजारोजण सहभागी झाल्याने लातूर तिरंगामय झालेले पाहण्यास मिळाले. या रॅलीत माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह खा. सुधाकर श्रृंगारे, शहर जिल्हा अध्यक्ष गुरुनाथ मगे, शहर जिल्हा अभियानाचे संयोजक अ‍ॅड. दिग्विजय काथवटे, यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व लातूरकर बहुसंख्येने सहभागी झाले होते.
भारतीय स्वातंत्र्यदिनाचे यंदा अमृतमहोत्सवी वर्ष आहे. स्वातंत्र्यदिनाच्या 75 वर्षानिमित्त केंद्र व राज्य सरकारच्या वतीने हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी शासकीय यंत्रणासह विविध राजकीय व सामाजिक संघटनाही यामध्ये आपले योगदान देत आहेत. भाजपाच्या वतीनेही गत आठवडाभरापासून अभियानाच्या जनजागृतीकरीता आणि अभियानात अधिकाधिक लोकसहभाग वाढवावा या उद्देशाने विविध उपक्रम हाती घेण्यात आलेले होते. दि. 13 ऑगस्ट पासून  दि. 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येकाच्या घरावर तिरंगा फडकाविण्यात येत आहे. या अभियानाला अधिक यशस्वी करण्यासाठी शहर जिल्हा भाजपाच्या वतीने दुचाकी तिरंगा रॅली काढण्यात आलेली होती. शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. या रॅलीच्या अग्रभागी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, खा. सुधाकर श्रृंगारे, शहर जिल्हा अभियानाचे संयोजक अ‍ॅड. दिग्विजय काथवटे, शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, संघटन सरचिटणीस मनिष बंडेवार, शिरिष कुलकर्णी, प्रविण सावंत, दुचाकी रॅली प्रमुख अनंत गायकवाड, रॅली सहप्रमुख अजित पाटील कव्हेकर, अभियानाचे सहसंयोजक श्रीराम कुलकर्णी आदी होते.
या रॅलीमध्ये भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यासह, लोकप्रतिनिधी, लातूरकर नागरीक बहुसंख्येने तिरंगा ध्वजासह सहभागी झाले होते. सदर रॅली महात्मा गांधी चौक, हनुमान चौक, गोलाई मार्गे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, स्वामी विवेकानंद चौक,  राजर्षी शाहु चौक मार्गे महात्मा गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजीव गांधी चौक मार्गे जाऊन या रॅलीचा समारोप जिल्हा क्रिडा संकुल येथे करण्यात आला. या रॅलीमुळे संपुर्ण लातूर तिरंगामय झालेले पाहण्यास मिळाले. या रॅलीत नागरीकांसह तरुण विद्यार्थी, महिला यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. या रॅलीत मनपाचे माजी सभागृहनेते अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे, माजी उपमहापौर देविदास काळे, माजी स्थायी समिती सभापती अ‍ॅड. दिपक मठपती, महिला आघाडीच्या अध्यक्षा मिना भोसले, माजी नगरसेविका तथा मंडल अध्यक्षा शोभा पाटील, रागिनी यादव, महेश कौळखेडे, विपुल गोजमगुंडे, किशन बडगिरे, व्यंकटेश कुलकर्णी, रवि लवटे, हणमंत कुलकर्णी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक बहुसंख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने